पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर नाराजी


प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव असायचं, पण.

बीडमध्ये मुंडे बहिणी विरुद्ध धनंजय मुंडे; प्रीतम मुंडेंनंतर पंकजा मुंडेंची टीका; म्हणाल्या “त्यांनी मोठेपणा दाखवला नाही, पण…”

बीडमध्ये मुंडे बहिण-भावांमध्ये सुरु असलेलं शाब्दिक युद्ध अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार प्रीतम मुंडे यांनी केलेल्या टीकेनंतर आता पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही, तर काळजी घेतली अशा शब्दांत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंना उत्तर दिलं आहे.


धनंजय मुंडे यांनी शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले, तर सायंकाळी बीड तालुक्यातील बेलेश्वरमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्ताने मुंडे बहिण भावात शाब्दिक युद्ध रंगलं. “पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो. प्रत्येक कोनशिला आणि निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव असायचं, पण आज त्यांनी मोठेपणा दाखवला नाही. मात्र आम्ही नक्की दाखवू,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“मी बीड जिल्ह्याची बदनामी केली नाही, तर काळजी घेतली. ते विरोधी पक्षात असताना वेठीस धरायचे,” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली.


प्रीतम मुंडेंना धनंजय मुंडेंचं जाहीर आव्हान

बीडमधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावरूनही मुंडे बहीण भावात चांगलीच जुंपली आहे. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याला बदनाम करू नका? अशी टीका भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली होती. यावर प्रीतम मुंडे यांनी प्रत्युत्तर देत खासदार प्रीतम मुंडे यांनी तुमच्याच नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी झाली असल्याचं म्हटलं होतं. यानंतर धनंजय मुंडे यांनी जाहीर आव्हानच दिलं होतं.


बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच बीड बिहार झालाय, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली होती. यावरच धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना हात जोडून विनंती करतो पण जिल्ह्याची बदनामी करू नका, अशी विनंती केली होती. त्यावर प्रीतम मुंडे यांनी ”बीड जिल्ह्याची जी बदनामी झाली आहे, ती तुमच्या नाकर्तेपणामुळे झाली आहे,” असं म्हटलं होतं. त्यावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली होती.


“ज्या खासदार सात-साडे सात वर्ष काम करत आहेत. देशाच्या नेत्या म्हणून त्यांच्या वडीलभगिनी काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात रेल्वेचा डबा तयार करण्याचा कारखाना लातूरला जातो. मग कोणाचा नाकर्तेपणा?,” अशी विचारणा धनंजय मुंडेंनी केली होती.


“तो कारखाना इथे असता तर आम्हीदेखील स्वागत केलं असतं. तुम्ही किती कर्ते आहात हे आम्हीच जगाला सांगितलं असतं. पण खासदार, मंत्री, केंद्रात सरकार असूनही इतका मोठा प्रकल्प या मागासलेल्या बीड जिल्ह्यात तुम्हाला थांबवता आला नाही आणि आम्हाला नाकर्ते म्हणता,” अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी संताप व्यक्त केला. कर्ते, नाकर्तेपणाची चर्चा एकदा खुल्या व्यासपीठावर होऊ द्या असं आव्हानही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिलं होतं.


“पण कृपा करुन जिल्ह्याला बदनाम करु नका. जिल्ह्याच्या मातीची किंमत तुम्हाला कळलेली नसली तरी आमचं त्याच्याशी इमान जोडलेलं आहे, त्याची चेष्टा करु नका,” असंही ते म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या