“हे पद्मश्रीला पात्र आहेत का?” अक्षय, शाहरूख आणि अजय देवगणच्या तंबाखूच्या जाहिरातीवर भाजपा नेत्याची संतप्त प्रतिक्रिया


बॉलिवूड स्टार्सच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातीचा मुद्दा सध्या जोर धरू लागला आहे. अभिनेता अमिताभ बच्चन ,अजय देवगण, अक्षय कुमार ते शाहरुख खान  यांसारखे मोठे कलाकार अशा जाहिरातींमध्ये दिसत आहेत. आता गोवा भाजपच्या वैद्यकीय सेलचे निमंत्रक शेखर साळकर यांनी बुधवारी नरेंद्र मोदींना तंबाखू उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या जाहिरातींमध्ये कलाकार दिसल्यामुळे त्यांना पद्म पुरस्कारांपासून वंचित ठेवण्याचा आग्रह केला आहे.

शेखर साळकर ट्वीट करत म्हणाले, “तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींद्वारे कर्करोगाचा प्रचार करण्यासाठी आता अक्षय कुमार देखील अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अजय देवगण यांच्या टोळीत सामील झाला असून यासाठी आता माझ्याकडे शब्द नाहीत. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ते पद्म पुरस्कार विजेते आहेत.”

पुढे ट्वीटमध्ये लिहितात, “ फिट इंडिया मूव्हमेंटद्वारे देशाला निरोगी बनवण्यासाठी खूप मेहनत करत आहेत. पण हे संपूर्ण मिशन या तथाकथित प्रभावशाली लोकांमुळे उद्ध्वस्त होत आहे, जे त्यांच्या या जाहिरातींद्वारे तरुण पिढीला तंबाखूच्या आहारी जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. हे कलाकार खरोखरच पद्मश्रीला पात्र आहेत का?”

साळकर पुढे म्हणाले की, “पैसा कमावण्याच्या शर्यतीत आपलं मन आणि नैतिकता विकून त्या निष्पाप तरुणांच्या डोक्याला पणाला लावणाऱ्या या कुप्रसिद्ध, निंदनीय अभिनेत्यांवर लोकांनी विश्वास ठेवला आहे. हे तरुण त्यांना फॉलो करतात आणि त्याच्याकडून प्रभावित होतात.”

नुकताच, अक्षय कुमार विमल पान मसालाची जाहिरात करताना दिसला होता, ज्यानंतर तो सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाला. अक्षयला अशा धोकादायक गोष्टींची जाहिरात करताना पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. दरम्यान, आता अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांची माफी मागितली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या