लोडशेडिंगमुळे बीड जिल्ह्यातील नागरिक त्रस्त

 



बीड :
बीड जिल्ह्यात नेहमीच वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून महावितरणाचा गलथान कारभार हा जनतेसमोर येत राहिला आहे. मात्र, हाच भोंगळ कारभार आता लोकांच्या माथी पडत असल्याने बीड जिल्ह्यातील जनता हैराण झाली आहे. अनेक गावात वीज नसल्याने देखील अनेक वेळा आंदोलन देखील करण्यात आले. मात्र, आता राज्यातील काही भागात अचानकपणे लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याने जनता हैराण झाली आहे. बीड जिल्ह्यात देखील बीड सह पाच तालुक्यात लोडशेडिंग सुरू झाल्यानं ऐन उन्हाळ्यात लोकांचा घाम निघत आहे. विशेष म्हणजे रेग्युलर वीजबिल भरणाऱ्या लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्यानं लोक वीज मंडळाच्या नावाने शिमगा करत आहेत.

बीड जिल्हा आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला आहे. काल रात्रीपासून बीड जिल्ह्यातील फिडरवर सहा ते आठ तासांचे चक्री भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे नगारिकांना उकाडा आणि शेतकर्‍यांना ऊसाला पाणी देण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. महावितरणतर्फे बीड शहर, बीड ग्रामीण, गेवराई, शिरूर, पाटोदा आणि आष्टी उपविभागात विजेच्या मागणीत अचानकपणे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध वीज आणि तुटीमुळे महावितरणाला आपत्कालीन भारनियमन करावं लागत आहे.

संपूर्ण राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे औष्णिक वीज निर्मीतीचे काही ठिकाणचे संच बंद आहेत. त्यात उन्हाळा असल्याने वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे इर्मजन्सी लोडशेडींग केल्याशिवाय पर्याय नाही. कुठल्याही क्षणी वीज जावू शकते. फिडरवाईज चक्रीप्रमाणे लोडशेडींग करण्यात येऊन ग्राहकांना वीज पुरवठा करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं.


मात्र, अधिकाऱ्यांचं नियोजन हे जनतेला माहीत आहे. नेहमीच नियोजनाखाली महावितरणाचे अधिकारी वेळकाढूपणा करतात आणि तुटपुंजे कारण देऊन जनतेला वेठीस धरण्याचे काम या अधिकार्‍याकडून होतं. अशीही चर्चा नागरिकांमधून होताना पाहायला मिळते. मात्र, महावितरण कंपनी कधी सुधारणार कधी महावितरणाचा नियमितपणा लोकांना पाहायला मिळणार हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या