छत्रपती संभाजीराजेंचा मोठा निर्णय, खासदार निधीची अखेरची रक्कम 'या' कामासाठी देणार


 अहमदनगर :
राज्यसभेतील खासदार छत्रपती संभाजीराजे यांची खासदार पदाची मुदत येत्या मे महिन्यात संपत आहे. त्यांना खासदार म्हणून मिळणाऱ्या निधीतील शेवटची रक्कम शिल्लक आहे. हा ३० लाखांचा निधी अहमदनगरमध्ये मोठ्या कामासाठी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यांतून नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या विकासासाठी हा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. या स्मारकाच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. हुतात्मा चौथे शिवाजी महाराज यांचे नगरमध्ये स्मारक आहे. नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून या स्मारकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मंगळवारी छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले.


स्मायलिंग अस्मिता, शेतकरी, कष्टकरी विद्यार्थी संघटनेने या कामासाठी पुढाकार घेतला. संघटनेनेच आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, आमदार संग्राम जगताप, पदमश्री पोपटराव पवार उपस्थित होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत तोडमल यांनी प्रास्ताविक करताना या स्मारकाची माहिती दिली. त्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला आराखडाही छत्रपतींना सादर केला. स्मारकाचे काम व्हावे, तसेच जिल्ह्यातील मराठा विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी कोठे अडवणूक होऊ नये, यासाठी लक्ष घालावे अशी मागणी तोडमल यांनी केली.

यानंतर बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, ‘चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृती जपतानाच कृतीयुक्त कार्य करण्याचीही गरज आहे. गोऱ्या इंग्रजांनी कपटाने त्यांची हत्या केली असली तरी आपल्याच काही लोकांनी त्यांना साथ दिली आहे. त्यांची नावे जगजाहीर आहेत. मला ती घेण्याची इच्छा नाही. ज्या नगरमध्ये त्यांची हत्या झाली, तिथे त्यांचे भव्य स्मारक असले पाहिजे. माझ्या खासदारपदाची मुदत २ मे रोजी संपत आहे. खासदार म्हणून मला मिळणाऱ्या निधीतील शेवटची काही रक्कम शिल्लक राहिली आहे. ती तीस लाख रुपयांची रक्कम मी या स्मारकासाठी देत आहे. उरलेली रक्कम मिळवण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यास मदत करू,’ असेही संभाजीराजे यांनी सांगितले.


छत्रपतींचे विचार आणि कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी आजची तरुण पिढी चांगले काम करीत असल्याचे सांगून ते म्हणाले की, ‘केवळ मराठा आरक्षणासाठीच नव्हे तर छत्रपतींचे विचार पुढे घेऊन जाणारी ही निरपेक्ष वृत्तीची तरुण मंडळी पाहिली की समाधान वाटते. त्यांना आपण प्रोत्साहन आणि संधी दिली पाहिजे. विविध संस्थांवर त्यांना स्थान दिले पाहिजे. भले संस्थेत मतदानाचा अधिकार नका देऊ, मात्र त्यांचे विचार, त्यांच्या नव्या कल्पना जाणून त्यांचा संस्थेच्या कामात वापर करण्यासाठी तरी त्यांना संस्थांवर स्थान द्यावे,’ अशी सूचनाही छत्रपती संभाजीराजे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या