संजय राऊतांची युपीमधील भोंगेविरोधी मोहिमेवर पहिली प्रतिक्रिया

 


“उत्तर प्रदेशात भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत तर…”

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशामधील योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आज मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन केलं आहे असं म्हटलंय. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलंय.

महाराष्ट्र सरकाराची भूमिका मांडली…

“उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे जे काही पालन करायचे आहे ते करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारच्या आदेशाचे पालन महाराष्ट्रात करावे ही सरकारची भूमिका आहे. मला असे वाटते की, महाराष्ट्र सरकार नेहमी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करते,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपाने बहिष्कार टाकला

भोंग्यांचा विषय राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही राऊत यांनी केलाय. “भोंग्याच्या प्रश्नांसंदर्भात राज्यातील सर्व राजकीय पक्षांना सरकारने चर्चेसाठी बोलवलं होतं. महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांना सरकारने बोलावलं होतं. सर्व मिळून निर्णय घेऊ असं सांगण्यात आलेलं. मात्र या बैठकीवर भाजपाने बहिष्कार टाकला,” असं संजय राऊत म्हणालेत.


सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय तर…

पुढे बोलताना राऊत यांनी भाजपाने बैठकीला अनुपस्थित राहून या मुद्द्यावरुन राजकारण करायचं असल्याचं स्पष्ट केलंय असा टोलाही लगावलाय. “तुम्हाला राजकारण करायचंय, अशांतात निर्माण करायची. लोकांची दिशाभूल करायचीय,” असं राऊत यांनी भाजपाला सुनावलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असेल तर भूमिका ही राष्ट्रीय स्तरावर हवी, असंही राऊत म्हणाले. तसेच, योगी सरकारचा निर्णय महत्वपूर्ण आहे असं सांगताना, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय तर आपण सर्व त्याचं पालन करु, असंही राऊत म्हणाले आहेत.


उत्तर प्रदेशात नेमकं घडलंय काय?

उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आलीय. “राज्यभरामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवणे तसेच त्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. याच अंतर्गत एकूण १० हजार ९२३ भोंगे हटवण्यात आलेत. तर ३५ हजार २२१ भोंग्यांच्या आवाजाला मर्यादा घालून देण्यात आलीय,” असं अतिरिक्त निर्देशक सचिव (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी म्हटलंय.


योगींच्या निर्देशानंतर कारवाई

मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचं पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, असं मत व्यक्त केलेलं. “भोंगे वापरण्याला हरकत नाही. मात्र भोंग्यांचा आवाज त्या धार्मिक स्थळांच्या आवातापुरता मर्यादित राहील याची काळजी घ्या. याचा इतर लोकांना काही त्रास होता कामा नये,” असं योगी बैठकीमध्ये म्हणाले होते. यानंतर गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाच्या धार्मिक नेत्यांनी भोंग्यांचा आवाज कमी करण्यावर सहमती दर्शवली.

राज ठाकरेंकडून कौतुक

राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय. मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. योगी सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावरुन व्यक्त होताना राज यांनी एक पोस्ट केलीय. यामध्ये राज यांनी, “उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार,” असं म्हटलंय. पुढे बोलताना राज यांनी, ठाकरे सरकावर निशाणा साधलाय. “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!”, असं म्हटलंय. तर पोस्टच्या शेवटच्या ओळीत राज यांनी, “महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,” असंही म्हटलं आहे.

अमृता फडणवीसांनी लगावला टोला

राज ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राज्यातील राज्यकर्ते हे भोगी असल्याचा टोला लगावला आहे. याच टीकेचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता यांनी केलंय. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरला आहे.

मंदिरं आणि मशिदींनीही घेता पुढाकार…

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमधील मंदिरांपासून ते अगदी लखनऊमधील शिया मशिदींपर्यंत सर्वांनीच यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसतंय. मथुरेमधील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराने रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन म्हटली जाणारी मंगल चरण आरती भोंग्यावर न वाजवण्याचा निर्णय घेतला. भागवत भवन येते श्री कृष्ण जन्मभूमीच्या आवारामध्ये रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन एक तास आरती ऐकवली जायची. अशाच प्रकारे अयोध्येसहीत इतर शहरांमधून प्रतिसाद मिळत असून अनेकांनी स्वइच्छेने आवाजावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतलाय.

लखनऊमधील इदगाहचे इमाम असणाऱ्या मौलाना खलिद रशिद फिरंगी महाली यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सर्व सुन्नी मशिदींना भोंग्यांचे आवाज कमी करण्याचे निर्देश दिल्याचं म्हटलंय. “आम्ही सर्व मशिदींमधील भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले असून आवाज मशिदीबाहेर येणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलंय,” असं इमाम म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या