आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार

 




सभेआधी पदाधिकाऱ्यांना नोटीस; पक्ष म्हणाला “आम्हाला धमक्या देण्यापेक्षा…”

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर होत असलेल्या राज ठाकरेंच्या या सभेकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी दिलेल्या अल्टिमेटमसाठी दोन दिवस शिल्लक असताना होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे. दरम्यान या सभेआधी मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना जे लोक कायदा पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवा असं आव्हानच दिलं आहे.

“आम्ही सर्वांनी गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंची ही सभा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरेल असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे राज ठाकरेंच्या या सभेतनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. आजही सभाही ऐतिहासिक सभा असेल. कारण या सभेकडे फक्त संभाजीनगर, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे कोणते मुद्दे मांडणार याची उत्सुकता सर्वांना आहे,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

३ तारखेच्या अल्टिमेटमसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “राज ठाकरे कायद पाळा असं सांगत असून सरकारने तो पाळला पाहिजे. आम्हाला धमक्या देण्यापेक्षा जे लोक कायदा पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत या हिंदुत्ववादी सरकारने दाखवली पाहिजे”.

“मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधल्या आसरानीसारखी आहे. अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपावर तुटून पडा आणि आम्ही घऱात बसतो अशी अवस्था आहे,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. “राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता आम्हालाही आहे. ते काय बोलणार हे आधी कोणीच सांगू शकत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या