औरंगाबादमध्ये करमाडजवळ एसटी-पीकअपचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, तर दोन जखमी


औरंगाबाद :
जिल्ह्यातील करमाडजवळ एसटी बस आणि पीकअप वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झालेत.

औरंगाबाद-जालना रस्त्यावरील गाढे पिंपळगावजवळ राज्य परिवहन महामंडळाची बस (एम. एच. १३ सी. यू. ६८३८) व पीकअप बोलेरो (एम. एच. २१ बी. एच. ४३३१) या वाहनांमध्ये बुधवारी (२५ मे) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले. या अपघाताची नोंद करमाड पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र बोडके यांनी दिली.

अपघातातील मृतांमध्ये लहू ज्योतीराम राठोड (वय ५०, रा. रेणुकानगर, औरंगाबाद), अशोक जयसिंग चव्हाण, रणजित जयसिंग चव्हाण, शांतीलाल हरी चव्हाण (तिघेही रा. सातारा तांडा) व लता उर्फ पारूबाई ज्ञानेश्वर जाधव (रा. राजनगर बायपास, औरंगाबाद) यांचा समावेश आहे. विकास ढेरे व रोहित विकास ढेरे (दोघेही रा. गुरु लॉन्सच्या मागे, औरंगाबाद) हे दोघे जखमी झाले.

मृतांमध्ये दोन भावांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र बोडके पथकासह दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत व जखमींना बाहेर काढले. उपचारासाठी जखमींना व उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, पोलीस उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांनी भेट दिली. यावेळी करमाड ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या