आ. रोहित पवारांच्या कार्यात अहिल्यादेवींचा दृष्टीकोन : शरद पवार

 



जामखेड : 

अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यकारभारात जसं काम केलं तेच काम आ. रोहित पवार पुढे घेऊन जात आहेत, असे गौवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काढले. चौंडी या अहिल्याबाईंच्या जन्मस्थळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
यावेळी अहमदनगर या जिल्हाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, अमादर बाळासाहेब अजाबे, आमदार निलेश लघें, रोहित पाटील, सभापती सुर्यकांत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, सरपंच प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचं काम हे सर्वसमावेशक होतं. पर्यटनाला प्रोत्साहन देणारं होतं. राज्यावर संकट आलं तरी उभं राहिलं पाहिजे आणि राज्यकारभार केला पाहिजे आणि ते करत असताना शेवटच्या व्यक्तीसाठी काही करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे सूत्र आपल्या नजरेपुढं ठेवलं. अहिल्यादेवींच्या आजचा जयंतीचा कार्यक्रम हा स्त्री वर्गाचा सन्मान करणं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणं आणि त्यांचा अधिकार वाढवणं अतिशय महत्वाचं आहे.

इथला कर्जत-जामखेडचा भाग हा महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आहे. इथलं हे दुखणं जुनं आहे. एकेकाळी शेजारच्या अकोल्याला पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः आल्या होत्या. त्यांनी इथली स्वतः पहाणी केली. तरीही इतक्या वर्षात इथला पाण्याचा, उद्योगाचा प्रश्न सुटला नाही. पण आनंद एका गोष्टी आहे की, कालच्या निवडणुकीत तुम्ही रोहित पवारांसारख्या तरुण कार्यकर्त्याला निवडून दिलं आणि त्याला संधी दिली. या दोन अडीच वर्षात अनेक काम त्यांची अशी दिसतात ज्यामध्ये अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा स्पष्ट विचार दिसतो.

अहिल्यादेवींनी आपल्या आयुष्यात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठिकठिकाणी बारवं केली त्यातून पाण्याची सुविधा केली. कर्जत-जामखेडमधील लोकांशी चर्चा केल्यानंतर इथल्या पाण्याचा प्रश्न समोर येतो. रोहित पवार यावर काम करत आहेत.

अहिल्याबाईंचं दुसरं वैशिष्ट म्हणजे त्यांनी आपल्या राज्यात लोकांना काम दिलं. विणकरांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून माहेश्वरी कपडा, माहेश्वरी साडी संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली याची सुरुवात अहिल्यादेवींनी केली. आज अहिल्यादेवींचं स्मरण करताना रोहित पवारांनी इथं एमआयडीसी कशी होईल यासाठी बैठका घेतल्या.

तिसरी गोष्ट महत्वाची अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात दळणवळणाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले. अनेक ठिकाणी त्यांनी रस्ते केले. रोहितनं जबाबदारी घेतल्यानंतर दोन महामार्ग मंजूर झाले. त्यामुळं रस्ते, पाणी, रोजगार आहे जे अहिल्यादेवींनी चालू ठेवलं तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुमचा आमदार काम करतोय. याला मनापासून आनंद होतोय. मला सर्वांना एकच विनंती आहे की, ही विकासाची गंगा या भागात येईल या कामात तुमचं सर्वांच सहकार्य सर्वांना मिळेल.
_________________

 मराठा, धनगर आरक्षणासाठी दिल्लीत वजन वापरा

   शरद पवार यांनी केंद्रात आपले वजन वापरून मराठा तसेच धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर करावा.  आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करावेत. त्यामुळे मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्य मदत होईल, अशी विनंती आ. रोहित पवार यांनी केली. 

---------------

 जयंतीसाठी दरवर्षी २५ लाखांचा निधी : ना. मुश्रीफ 

अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचे सर्वधर्म समभाव आणि समतेचे तत्व सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या या शिकवणूकीची प्रेरणा आत्मसात व्हावी, यासाठी दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची चोंडीत जयंती करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या