केंद्राकडून तिळाच्या हमी भावात सर्वाधिक वाढ ; सोयाबीनला मिळाली एवढी किंमत

 



केंद्र सरकारने तीळाच्या हमीभावात सर्वाधिक वाढ केली. सोयाबीनला ३५० रुपयांची वाढ मिळाली. तर कापसाला लांब धाग्यासाठी ३५५ रुपये आणि मध्यम धाग्यासाठी ३५४ रुपये वाढविण्यात आले.

केंद्राने यंदा सोयाबीनसह इतरही तेलबिया पिकांच्या हमीभावात गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक वाढ केल्याचे दिसते. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकित बुधवारी खरिप हंगाम २०२२-२३ साठी १४ पिकांच्या हमीभाव वाढीला मंजुरी देण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात अधिक वाढ केली. या १४ पिकांमध्ये तिळासाठी सर्वाधिक ५२३ रुपये वाढ करण्यात आली.


२०२१-२२ च्या हंगामात सोयाबीनच्या हमीभावात ७० रुपये वाढ केली होती. मात्र यंदा ३५० रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळं सोयाबीनचा हमीभाव ३९५० रुपयांनी ४३०० रुपये झाला. तर मध्यम धागा कापसाच्या हमीभावात ३५४ रुपयांची वाढ करून ६०८० रुपये करण्यात आला. तर लांब धागा कापसासाठी ३५५ रुपयांची वाढ देऊन ६३८० रुपये हमीभाव जाहिर केला. मुगाच्या हमीभावात ४८० रुपये वाढ केली. मुगाचा हमीभाव आता ७२७५ रुपयांवरून ७७५५ रुपयांवर पोचला. तर तुरीच्या हमीभावात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ३०० रुपयांची वाढ करण्यात आली. हंगामात तुरीला आता ६६०० रुपये हमीभाव जाहिर झाला. या पिकांमध्ये मक्याला सर्वांत कमी ९२ रुपये वाढ मिळाली. मक्याचा हमीभाव १८७० रुपयांवरून १९६२ रुपये करण्यात आला.


भूईमुगालाही ३०० रुपयांची वाढ मिळाली. खरिपात आता भुईमुगाला ५८५० रुपये हमीभाव मिळेल. मागील हंगामात २७५ रुपये वाढ मिळाली होती. तर सूर्यफुलाचा हमीभावही ३८५ रुपयांनी वाढविण्यात आला. आता सूर्यफुलाला ६४०० रुपयांचा हमीभाव जाहिर झाला. मागील हंगामात सूर्यफुलाला केवळ १३० रुपयांची वाढ मिळाली होती.


केंद्र सरकारने खरिप हंगाम २०२२-२३ मध्ये तेलबिया पिकांच्या हमीभावात चांगली वाढली. तीळाच्या हमीभावात सर्वाधिक ५२३ रुपये वाढ झाली. तर सोयाबीन ३५० रुपये, सूर्यफुल ३८५ रुपये आणि भुईमुगाला ३०० रुपये वाढ मिळाली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या