“एकनाथ शिंदेंना नियंत्रणात ठेवायचं होतं तर…”; भाजपाकडून ‘फडणवीसांचा बळी का?’, प्रकाश आंबेडकरांना पडला प्रश्न


राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या अंतिम टप्प्यात भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी गुरुवारी सायंकाळी राजभवनात पार पडला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपाचा उद्देश स्पष्ट झाला असला तरी फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देण्यात आल्याने पक्षनेते बुचकळ्यात पडल्याचं चित्र दिसत असून विरोधीपक्षांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी ‘देवेंद्र फडणवीसांचा बळी भाजपाने का दिला?’ असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच आमची सहानुभूती फडणवीसांसोबत असल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय.

प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांनी चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री करता आलं असतं असं म्हटलंय. तसेच चंद्रकांत पाटील हे मागील सरकारच्या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे काम करत होते. त्याप्रमाणे ते केंद्रीय गृहमंत्री आणि माजी भाजापाध्यक्ष अमित शाह यांच्या जवळचे असल्याचं सांगत आंबेडकर यांनी असं असतानाही फडणवीसांना का उपमुख्यमंत्री करण्यात आलं अशा अर्थाचं ट्विट केलं आहे.

“चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांच्या जवळचे आहेत. मागच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्र्यासारखेच वागले.एकनाथ शिंदे यांना नियंत्रणात ठेवायचं होतं तर ते चंद्रकांत पाटीलही करू शकले असते. देवेंद्र फडणवीसांचा बळी का?”, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी ट्विटरवरुन विचारला आहे. तसेच त्यांनी आमची सहानुभूती देवेंद्र फडणवीसांसोबत आहे अशा अर्थाचा हॅशटॅगही वापरला आहे.

शरद पवारांचाही टोला

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हे जेवढे धक्कादायक त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास दिल्लीच्या नेतृत्वाने भाग पाडले हे अधिक धक्कादायक आहे, असं मत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर व्यक्त केलंय. “ज्यांनी पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले, आता अडीच वर्षे ते विरोधी पक्षनेते होते, त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले, भाजपाच्या वरिष्ठांचा व नागपूरचा हा आदेश असावा आणि नागपूचा आदेश म्हटले की तो तंतोतंत पाळावा लागतो. नागपूरचा आदेश मोडता येत नाही आणि सत्तेत जाण्याची संधी मिळाली तर, ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण म्हणजे फडणवीस होय,” असा टोलाही पवार यांनी हाणला.

शिंदेंनाही कल्पना नसेल

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे हा आश्चर्यकारक निर्णय असल्याचे ते म्हणाले. “शिवसेनेतील ३९ आमदारांचे नेतृत्व करणारे शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदापेक्षा अधिकची मागणी केली असेल. त्यामुळे भाजपा नेतृत्वाने हा निर्णय घेतला असेल, कदाचित त्याची कल्पना शिंदेंनाही नसावी,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या