Breaking News

माझ्यावर विश्वास ठेऊन एवढा मोठा निर्णय घेणाऱ्या बंडखोर आमदारांचे आभार : एकनाथ शिंदे


महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक मांडण्यात आला. त्यानंतर १६४ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. तर ठरावाच्या विरोधात ९९ मतं पडली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली. रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे. गेले १० दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली होती. बहुमत सिद्ध करण्याच्या रणनीतीबाबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीत शिंदे गट आणि भाजपाचे आमदार उपस्थित होते. आपल्याला ४० बंडखोर शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा शिंदेंचा दावा आहे. तर १६६ मतांनी सरकार बहुमत सिद्ध करेल, असा दावा फडणवीस यांनी केला होता.

सत्ताधाऱ्यांमधील कुणीही एकाने मी त्यांचं काम केलं नाही सांगितलं, तर मी माफी मागून बाहेर जाईन : जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “सत्ता आली काय, गेली काय याचं मलाही काहीच वाटत नाही. पण मी सत्तेत असताना असं एकही उदाहरण नाही की माझ्याकडे आले आणि मी काम केलं नाही. सत्ताधाऱ्यांमधील कुठल्याही आमदाराने उठून सांगावं की गृहनिर्माणमध्ये गेलो आणि जितेंद्र आव्हाडने त्यांचं काम केलं नाही. असं एक जरी उदाहरण दिलं तरी मी त्या सदस्याची माफी मागून बाहेर निघून जाईल.”

"एकनाथ शिंदेजी संघटना आणि सरकार यामधील फरक लक्षात ठेवा"

एकनाथ शिंदेजी संघटना आणि सरकार यामधील फरक लक्षात ठेवा. सर्वाना सोबत घेऊन, समाधान करत सरकार चालवावं लागणार आहे असा सल्ला हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे. आमच्यावरही थोडा अन्याय केला त्यामुळे नाराजीही आहे असंही ते म्हणाले.

संघटना वाढण्याचा प्रत्येकाला अधिकार - हितेंद्र ठाकूर

एकनाथ शिंदे यांनी आपली संघटना वाढवण्यासाठी अनेकांना झटके दिले आहेत. आमचाही आमदार घेतला होता. कसं जमतं माहिती नाही. फडणवीसांनादेखील ही कला अवगत आहे. पण संघटना वाढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असंही हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.

“खरंच आहे ही मंडळी ‘ईडी’मुळेच आली आहे, फक्त ती ‘ईडी’ म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहेत”

राज्यात भाजपा-शिंदे या नव्या सरकारवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कारण, या सरकारने आज विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, ईडीच्या भीतीमुळे शिवसेनेच मंत्री, आमदार हे भाजपासोबत गेले असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बोललं जात असल्याने, त्याला देखील फडणवीसांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर दिलं.

आम्ही दावणीला बांधलेले आमदार नाही - हितेंद्र ठाकूर

आम्ही काही कोणाच्या गोठ्यात बांधलेल्या गाई, दावणीला बांधलेले आमदार नाही. आमचा पक्ष वेगळा आहे. आमचे शब्द आमच्या पद्धतीने देतो. चांगल्या शब्दांत बोलता येणाऱ्या गोष्टी ज्याप्रकारे झाल्या ते वाईट आहे असं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले

एकीकडे विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले आहेत. शिवसेना भवनात जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुखांची बैठक होणार आहे.

"पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल"

पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असा दावा सपाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. बाहेर लोकांमध्ये फिरुन पहा, प्रचंड नाराजी आहे असंही त्यांनी सांगितलं.

"नवे मुख्यमंत्री अल्पसंख्यांकांचे प्रश्न ऐकतील अशी आशा"

नवे मुख्यमंत्री अल्पसंख्यांकांचे प्रश्न ऐकतील अशी आशा आहे असं सपाचे आमदार रईस शेख यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपण तटस्थ राहिण्यामागील कारण सांगितलं. किमान समान कार्यक्रमातील मुद्द्यांवर फारकत झाल्यानं तटस्थ राहिलो असं त्यांनी सांगितलं आहे. तसंय या बंडासाठी आपणही जबाबदार असल्याचं ते म्हणाले.

शिवसेनेतील अजून काही जण आमच्याकडे येतील - गुलाबराव पाटील यांचा दावा

चार लोकांच्या टोळक्यानं उद्धव ठाकरेंना वहावत नेलं. माझी त्यांना विनंती आहे की, आजुबाजूचे आहेत त्यांना बाजूला करा. पट्टी बांधून तुम्हाला धृतराष्ट्राप्रमाणे सांगत आहे त्यांना दूर करा.

आमदार वारंवार एकनाथ शिंदे यांच्याकडे जात होते. कधीही त्यांनी आपण नाराज असल्याचं सांगितलं आहे का हे शोधून पाहा. शिवसेनेतील अजून काही जण आमच्याकडे येतील अशी स्थिती आहे असाही दावा त्यांनी केला.

"एकटे एकनाथ शिंदे शिवसेना वाचवण्यासाठी फिरत होते"

याआधी नारायण राणे, भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता. तुम्ही आम्ह्ला पुन्हा घरट्यात, मातोश्रीवर या सांगायला हवं होतं. निवडून येण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात. आम्ही फार मोठं आव्हान घेऊन बाहेर पडलो आहोत. एकटे एकनाथ शिंदे शिवसेना वाचवण्यासाठी फिरत होते. शरद पवारांसारखी व्यक्ती तीन वेळा जळगावमध्ये आले, अजित पवार, जयंत पाटील सगळे गेले पण मग आमचं दुख काय समजून घ्या. मोदींनी ५० आमदार असलेल्या माणसाला मुख्यमंत्री करुन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असंही गुलाबराव पाटील म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचं चरित्र वाचा, गुलाबराव पाटील यांचा टोला

शिवराळ भाषेत आमच्यावर टीका करण्यात आली. एकनाथ शिंदे सत्तेसाठी गेले असं बोलण्यात आलं. अहो त्यांचं चरित्र वाचा. त्यांची दोन मुलं गेली तेव्हा दिघे साहेबांना त्यांना अनाथांचा नाथ हो सांगितलं होतं. आज बाळासाहेबही त्यांना आशीर्वाद देत असतील असं गुलाबराव पाटील म्हणाले.

"आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली"

फडणवीस मुख्यमंत्री असताना नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्या स्थानावर होती. नी आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेना रसातळाला चाललीय तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. एकनाथ शिंदेंसोबत २० आमदार गेले. आम्ही रुग्णवाहिकेतून गेलो, आम्हाला उठाव करायचा होता. बाळासाहेब आमच्या मनात होते आणि राहतील. भाजपासोबत युती राहावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. शिंदे तर पाच वेळा गेले. फटाक्याची वात आत्ता लागलेली नाही. आमदारांची नाराजी आम्ही सांगत होतो. कोणी फोन उचलायचा नाही. अजित पवार सकाळी सहा वाजता यायचे, त्यांचा हेवा वाटायचा असं गुलाबराव पाटील म्हणाले.

आम्ही काही लेचेपेचे नाही, गुलाबराव पाटलांचा इशारा

आम्हाला मंत्री केलं हे उपकार आहेत. भास्कर जाधव यांनी चिंता कऱण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्हाला गटारीचं पाणी, प्रेतं अशा धमक्या देण्यात आल्या. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे असंही ते म्हणाले.

"४० आमदार फुटतात ती आजची आग नाही"

आम्ही शिवसेनेतच आहोत त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही असं गुलाबरावांनी अजित पवारांना उत्तर दिलं. ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचं घर सोडण्याची, बाळासाहेबांना त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमचीही इच्छा नाही असं ते म्हणाले. सर्व आमदार साहेबांना त्रास सांगण्यात जात होते. पण चहापेक्षा किटली गरम. आम्ही काय सहजपणे आमदार झालेलो नाहीत. भगवा हातात घेऊन इथपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत असं ते म्हणाले.

आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे - गुलाबराव पाटील

मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केलं. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असं वाटलंही नव्हतं. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. बाळासाहेबांकडे पाहून आम्ही संघटनेत आलो. लोकांची सेवा करण्यासाठी सत्ता हे साधन समजून काम करावं लागेल असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. आमच्यावर अनेकांनी बंड केल्याची टीका होत आहे. आम्हाला जे मिळालं आहे बाळासाहेबांमुळे मिळालं आहे. आम्ही बंड केलेलं नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी करुन दिली.

आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत - अशोक चव्हाण

बहुमत चाचणीला आम्ही नसल्याचा वेगळा अर्थ काढू नका. उशिरा पोहोचल्याने आम्ही मतदान करु शकलो नाही. मी येईपर्यंत सभागृहाचे दरवाजे बंद झाले होते. आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता - आदित्य ठाकरे

ज्यांनी व्हिपचं उल्लंघन केलंय त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्की आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना कधीच संपणार नाही असंही त्यांनी सांगितलं. २० मे रोजी एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्याबाबत विचारलं होतं असा खुलासाही त्यांनी केला. मध्यावधी निवडणूक लागण्याची शक्यता आदित्य ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली.

"पाण्याशिवाय मासा तसं सत्तेशिवाय तुमची अवस्था"

यांना भगव्याचा अर्थच माहिती नाही आणि तुम्हाला भाजपाला सत्तेची हाव असल्याचं म्हणता. फडणवीसांनी नेत्यांनी कसं वागावं याचा आदर्श ठेवला आहे. पाण्याशिवाय मासा तसं सत्तेशिवाय तुमची अवस्था झाली आहे अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

"मंत्रालयात पैसे छापण्याचा कारखाना सुरु झाला होता"

अडीच वर्षात खरंच काम केलं का? लोकांच्या प्रमोशनच्या फाईल पडून राहिल्या. मंत्रालयात पैसे छापण्याचा कारखाना सुरु झाला होता असा आरोप मुनगंटीवार यांनी केला.

“एकनाथ शिंदेंमध्ये पात्रता होती, तर मग तुमच्या टर्ममध्ये त्यांना एकच छोटंस खातं का दिलं होतं?”

राज्यात भाजपा-शिंदे या नव्या सरकारवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कारण, या सरकारने आज विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधत, “शिंदेंमध्ये पात्रता होती तर मग तुमच्या काळात त्यांना एकच छोटसं खातं का दिलं होतं?” असा सवाल केला.

बाळासाहेबांचं वचन कोणी मोडलं हे माहिती आहे - मुनगंटीवार

बाळासाहेबांचं वचन कोणी मोडलं हे माहिती आहे. अयोध्येच्या राम मंदिरात आमचं योगदान आहे सांगता आणि जे त्याला काल्पनिक समजता त्यांच्याकडे जाता अशा शब्दात मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली.

तुम्हाला भाजपा समजलेलीच नाही - मुनगंटीवार

एक दिवस तुम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाही का? फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तुम्ही आग लावण्याचं काम करत आहात. तुम्हाला भाजपा समजलेलीच नाही. ज्यांना काही समजलेलं नाही त्यांच्या दु:ख भिंती ऐकत होत्या. सगळं आपल्याच कुटुंबात नेत आहेत. असेल हिंमत तर सांगा कुटुंबातील व्यक्तीला नाही देणार. कार्यकर्त्यांनी फक्त झेंडेच मिरवायचे का? अशी विचारणा मुनगंटीवार यांनी केला.

अजित पवार यांचंही अभिनंदन केलं पाहिजे - मुनगंटीवार

अभिनंदन प्रस्तावात दुख आणि सत्ता गेल्याची वेदना दिसत आहेत. अजित पवार यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली आहे. जसे तुम्ही २३ नोव्हेंबरला इकडे येऊन उपमुख्यमंत्री झाले तसंच आता झालं. कधीतरी अशी उडी मारावी लागते असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे माघार घ्या, भास्कर जाधव यांचं आवाहन

एकनाथ शिंदेजी हे तुम्हाला लढवत आहेत. रक्तपात शिवसेनेचा होईल. शिवसैनिक घायाळ होतील. २५ वर्षांचा इतिहास पाहिला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे. तुमच्यावर यांचं प्रेम नाही तुम्ही मुख्यमंत्री झालात याचा आनंद आहे. पण शिवसेना वाचवण्यासाठी दोन पावलं मागे घ्या. जर शिवसेना फुटू दिली नाहीत तर महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचेल असंही भास्कर जाधव म्हणाले.

Post a Comment

0 Comments