भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : पंत, पंडय़ाच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाचा मालिका विजय; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर पाच गडी राखून मात


पीटीआय, मँचेस्टर : डावखुऱ्या ऋषभ पंतचे दमदार शतक आणि हार्दिक पंडय़ाच्या अष्टपैलू योगदानाच्या बळावर भारताने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडवर पाच गडी आणि ४७ चेंडू राखून मात केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ अशी सरशी साधली.

मँचेस्टर येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने दिलेले २६० धावांचे आव्हान भारताने ४२.१ षटकांत पूर्ण केले. भारतीय संघाची ४ बाद ७२ अशी स्थिती होती. मात्र, पंत (११३ चेंडूंत १६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १२५ धावा) आणि पंडय़ा (५५ चेंडूंत १० चौकारांसह ७१) यांनी पाचव्या गडय़ासाठी १३३ धावांची निर्णायक भागीदारी रचल्यामुळे भारताला विजय मिळवण्यात यश आले. यापूर्वीची ट्वेन्टी-२० मालिकाही भारताने २-१ अशा फरकाने जिंकली होती.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर इंग्लंडचा डाव ४५.५ षटकांत २५९ धावांत संपुष्टात आला. जसप्रीत बुमराच्या जागी संघात आलेल्या मोहम्मद सिराजने जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांना खातेही न उघडता बाद केले. मग सलामीवीर जेसन रॉय (४१), बेन स्टोक्स (२७) आणि कर्णधार जोस बटलर (६०) यांनी इंग्लंडचा डाव सावरला. मात्र, या तिघांनाही पंडय़ाने माघारी धाडले. त्यानंतर मोईन अली (३४), लियाम लिव्हिंगस्टोन (२७) आणि क्रेग ओव्हरटन (३२) यांनी काही काळ खेळपट्टीवर टिकाव धरल्याने इंग्लंडला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला. भारताकडून पंडय़ाने (४/२४) अप्रतिम गोलंदाजी केली.

त्यानंतर २६० धावांचा पाठलाग करताना भारताची आघाडी फळी पुन्हा अपयशी ठरली. शिखर धवन (१), कर्णधार रोहित शर्मा (१७) आणि विराट कोहली (१७) या तिघांनाही रीस टॉपलीने बाद केले. सूर्यकुमार यादवही (१६) मोठी खेळी करू शकला नाही. परंतु पंत आणि पंडय़ा यांनी जबाबदारीने खेळ करत भारताला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : ४५.५ षटकांत सर्वबाद २५९ (जोस बटलर ६०, जेसन रॉय ४१; हार्दिक पंडय़ा ४/२४, यजुर्वेद्र चहल ३/६०) पराभूत वि. भारत : ४२.१ षटकांत ५ बाद २६१ (ऋषभ पंत नाबाद १२५, हार्दिक पंडय़ा ७१; रीस टॉपली ३/३५)

सामनावीर : ऋषभ पंत

मालिकावीर : हार्दिक पंडय़ा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या