मुंबई, कोकणातील कोसळधार मध्य महाराष्ट्रातही बसरणार: कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकमध्येही वाढणार पावसाचा जोर


मुंबईसह ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून सर्वत्र सुरु असणाऱ्या मुसळधार पाऊसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवार दुपारपासूनच या भागामध्ये पवासाचा जोर सुरु असून मंगळवारी सकाळीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. सोमवारीच मुंबई, ठाण्यासहीत कोकणामधील काही भागांतील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पहायला मिळालं. देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलीय.

हवामानतज्ज्ञ आणि हवामानखात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरवरुन भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ढग जमा झाल्याची माहिती दिलीय. होसाळीकर यांनी पश्चिम किनारपट्टीचे उपग्रहांच्या माध्यमातून काढलेला फोटोही शेअर केला आहे. या फोटोसोबत होसाळीकर यांनी किनारपट्टीबरोबरच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केलीय.

“५ जुलै, सकाळी साडे नऊ वाजताची ही परिस्थिती आहे. पूर्ण पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच दक्षिण गुजरातपासून ते अगदी केरळपर्यंत ढगांची चादर दिसत आहे. काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार स्वरुपाचा तर काही निवडक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यात आहे,” असं होसाळीकर म्हणालेत. तसेच पुढे त्यांनी थेट प्रदेशांची नावं घेऊन या परिस्थितीचा परिणाम नेमका कोणत्या प्रदेशांवर होऊ शकतो याचा अंदाज व्यक्त केलाय. “कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाट या भागांमध्ये या परिस्थितीमुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे,” असं होसाळीकर म्हणालेत.

भारतीय हवामान खात्याने येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार तर संपूर्ण महाराष्ट्रात साधारण पावसाची वर्तवली आहे. सध्या मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरी बरसत आहेत. हीच स्थिती पुढील काही दिवस काय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनी योग्य ती खरबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. खालील फोटोमध्ये मुंबईवरील ढगांची सकाळी १० वाजून ५० मिनिटांची स्थिती पाहता येईल…

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ५ दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनची स्थिती निर्माण झालेली आहे. सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. तर दुसरीकडे उत्तर ओदिशा व लगतच्या दक्षिण झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात येत्या ५ दिवसात पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांतील पावसाची नोंद

ठाणे जिल्हा – उल्हासनगर १७३ मिमी, शहापूर ६८ मिमी, मुरबाड ३५ मिमी, अंबरनाथ १८८ मिमी, कल्याण १९४ मिमी

पालघर जिल्हा – तलासरी १३३ मिमी, वाडा ८९.२५ मिमी, विक्रमगड ८१ मिमी, पालघर १८३.५ मिमी, वसई १३६ मिमी, जव्हार ३६ मिमी, मोखाडा १९ मिमी, डहाणू १३१.२२ मिमी

रायगड जिल्हा – पेण १३९ मिमी, म्हसळा १२७ मिमी, माणगाव २३० मिमी, उरण १४६ मिमी, श्रीवर्धन ८१ मिमी, खालापूर १३५ मिमी, रोहा १०७ मिमी, पोलादपूर १६९ मिमी, मुरुड ११६ मिमी, सुधागड १३४ मिमी, तळा २४५ मिमी, पनवेल १७२.२ मिमी, माथेरान १२२ मिमी, अलिबाग ८८ मिमी, महाड १८८ मिमी, कर्जत १०१.६ मिमी

सिंधुदुर्ग जिल्हा – दुधमार्ग १४० मिमी, मालवण २२५ मिमी, मुळदे ११८.४ मिमी, सावंतवाडी १८७ मिमी, देवगड ४५ मिमी, वैभववाडी २३० मिमी, रामेश्वर ५५.६ मिमी

रत्नागिरी जिल्हा – खेड ७४ मिमी, लांजा ३४२ मिमी, चिपळूण १६९ मिमी, देवरुख २१० मिमी, मंडणगड २०५ मिमी, दापोली १४५ मिमी, गुहागर ७७ मिमी, वाकवली १२१ मिमी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या