RBI चे रायगड सहकारी बँकेवर निर्बंध: ठेवीदारांच्या पैसे काढण्यावर मर्यादा


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मुंबईस्थित सहकारी बँक रायगड सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती बिघडत असल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. या निर्बंधांमुळे ठेवीदारांना खात्यातून फक्त १५ हजार रुपये काढता येणार आहेत. सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असणार आहेत.

आरबीआयने निवेदनात सांगितलं आहे की, “ठेवीदारांना बचत खातं, चालू खातं किंवा इतर कोणत्याही खात्यातून एकूण जमा रकमेतील १५ हजारांपेक्षा कमी रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते”.

दरम्यान आरबीआयने रायगड सहकारी बँकेवर फक्त निर्बंध लावण्यात आले असून त्यांचा बँकिंग परवाना रद्द केलेला नाही असंही स्पष्ट केलं आहे. तसंच जोपर्यंत बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत बँक निर्बंधांसोबत दैनिंदन कामकाज करत राहणार असल्याचंही सांगितलं आहे. परिस्थितीनुसार निर्देशांमध्ये बदल करण्यासंबंधी विचार केले जाऊ शकतात अशी सूचनाही आरबीआयने दिली आहे.

दरम्यान दुसऱ्या एका निवेदनात आरबीआयने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बीडमधील श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या