“१२ कोटींची कार, १० लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा असलेल्या बनावट फकीराला टी-शर्टचा त्रास!”


केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने कन्याकुमारी येथून बुधवार ( ७ सप्टेंबर ) या पदयात्रेचा आरंभ झाला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या वेळी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपावला. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. मात्र, आता यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून त्यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. काँग्रेसचे नेते देखील पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत.

“१२ कोटींची कार, १० लाखांचा सूट आणि १.५ लाखांचा चष्मा असलेल्या बनावट फकीराला टी-शर्टचा त्रास! साहेब, तुम्हाला पाहिजे तेवढा गोंधळ करा, मुद्दा तुमच्या आणि आमच्या कपड्यांचा नाही. तो १४० कोटी लोकांच्या ‘रोटी, कपडा आणि मकान’चा आहे. आम्ही त्या मार्गाला चिकटून राहू.” अशा शब्दांमध्ये काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी ट्वीट करून निशाणा साधला आहे.

याशिवाय भाजपाकडून होणाऱ्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. “भाजपचे भय संपत नाही.! राहुल गांधींबद्दल टीशर्टची किंमत वगैरे असे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागणे यातूनच सिद्ध होतंय की ‘भारत जोडो यात्रे’मुळे भाजपाला धडकी भरली आहे. राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही आणि आठवण करूनच द्यायची झाली तर आपल्या देशाला एक असे फकीर लाभले आहेत जे १० लाख रुपयांचा सुट परिधान करतात.” असं नाना पटोलेंनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

तर, काँग्रेस पक्षानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुटबद्दल चर्चा करायची का? असं भाजपाला आव्हान दिलं आहे. “भारत जोडो यात्रेला नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून घाबरला काय. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यावर चर्चा करा. बाकी कपड्यांवर चर्चा करायची झाली, तर मोदींचा १० लाख रुपयांचा सुट आणि १.५ लाख रुपयांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल,” असं काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या