जसप्रीत बुमराहला पर्याय काय ?

 



 ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून टी 20 वर्ल्डकप सुरू होत आहे. या वर्ल्डकपपूर्वीच भारताला दुखापतींचा मोठा फटका बसला. आधी रविंद्र जडेजा आणि आता जसप्रीत बुमराह देखील वर्ल्डकपला मुकला आहे. अशा परिस्थितीत भारत 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकण्यासाठी रवाना होणार आहे. बीसीसीआयने अजूनही जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट जाहीर केलेली नाही. ज्यावेळी संघ निवडला त्यावेळी मोहम्मद शमी आणि दीपक चाहर यांना स्टँड बाय ठेवण्यात आले होते. भारताकडे 15 ऑक्टोबरपर्यंत बुमराहची रिप्लेसमेंट जाहीर करण्यासाठी वेळ आहे.

भारताकडे स्टँड बायमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे बीसीसीआय कधीही यापैकी एकाला मुख्य संघासोबत जोडू शकतो. जर बीसीसीआयने 15 ऑक्टोबरपर्यंत याबाबत निर्णय घेतला नाही तर संघात बदल करण्यासाठी आयसीसीची परवानगी घ्यावी लागले.

भारताच्या वर्ल्डकप संघाला दुखापतींनी चांगलेच दमवले आहे. वर्ल्डकप तोंडावर असताना संघातील सदस्य दीपक हुड्डाच्या फिटनेसबाबत अजून कोणतीच स्पष्टता दिसत नाहिये. तो देखील पाठीच्या दुखापतीवर एनसीएमध्ये उपचार घेत आहे. भारतीय संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे.

दरम्यान, भारताचा अव्वल गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याने भारताला आता प्लॅन B वर काम करावं लागणार आहे. या प्लॅनअंतर्गत भारताला आपली फलंदाजी मजबूत करावी लागले. कारण आशिया कप, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांच्या डेथ ओव्हरमधील मर्यादा स्पष्टपणे दिसून आल्या आहेत.

अशा परिस्थितीत फलंदाज गोलंदाजीतील ही कमतरता झाकण्याचा प्रयत्न करतील. ऑस्ट्रेलियात अष्टपैलू हार्दिक पांड्या हा पाचव्या गोलंदाजाची भुमिका बजावू शकतो. याचबरोबर भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि आर. अश्विन देखील फलंदाजीत आपले चांगले योगदान देऊ शकतात. त्यामुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारून आपल्या गोलंदांना काही अतिरिक्त धावांचे कुशन देऊ शकतील. मात्र हा प्लॅन प्रत्येकवेळी योग्य ठरेल याची शाश्वती नाही. याचं ताजं उदाहरण आपण दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात पाहिले.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 227 धावा ठोकल्या. कितीही भक्कम फलंदाजी घेऊन मैदानात उतरलो तरी प्रत्येकवेळी 220 धावांच्या पुढेचे टार्गेट भारतीय संघ चेस करेलच याची शाश्वती नसते. आफ्रिकेविरूद्ध भारताची टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर भारताने 178 धावांपर्यंत मजल मारली खरी परंतु भारताला विजयासाठी तब्बल 49 धावा कमी पडल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या