गोदाकाठ महोत्सवाची सांगता



 कोळपेवाडी प्रतिनिधी – 

दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कोपरगाव येथे शुक्रवार (दि.६) पासून सुरु होवून सलग चार दिवस नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची मोठ्या प्रमाणात विक्री होवून जवळपास ७५ लाखाच्या आसपास उलाढाल झाली. त्यामुळे मागील दोन वर्ष आर्थिक अडचणीत सापडलेल्या बचत गटांना  पुन्हा उभारी मिळाली असल्याचे प्रतिपादन गोदाकाठ महोत्सवाच्या आयोजक गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

                            बचत गटाच्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरु करण्यात आलेल्या गोदाकाठ महोत्सवाने दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढण्याबरोबरच उलाढालीचा देखील विक्रम केला आहे. त्यामुळे दोन वर्ष बचत गटाच्या महिलांपुढे निर्माण झालेले आर्थिक संकट दूर होण्यास मोठी मदत झाली आहे. कृषी साहित्य, तयार पापड, लोणचे, सौंदर्य प्रसाधने, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी, सर्व प्रकारची मसाले, सुगंधी अगरबत्ती, गृह सजावट साहित्य अशा अनेक प्रकारच्या खरेदीसाठी व विविध प्रकारचे खाद्यपदार्थाची चव चाखण्यासाठी सलग चौथ्या दिवशी देखील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मोठी उलाढाल नोंदली गेली आहे. त्याचबरोबर हजारो विदयार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ त्यामुळे भविष्यातील कलावंत घडविण्याची जबाबदारी देखील या गोदाकाठ महोत्सवाने पार पाडली आहे.

                        त्याचबरोबर गोदाकाठ महोत्सवाच्या व्यासपीठावर कोपरगावचे सुपुत्र डॉ.गावित्रे यांची निर्मिती असलेल्या 'ढिशक्याव' या मराठी चित्रपटाचे प्रमोशन देखील गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे गोदाकाठ महोत्सवाच आगळे वेगळे महत्व अधोरेखित होत आहे. नागरिकांच्या प्रतिसादातून यावर्षी सर्वच बचत गटाच्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व बचत गटाच्या स्टॉल्स धारकांना गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, आ.आशुतोष काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

                            शेतकरी, घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व बचत गटाची उत्पादने व छोट्या व्यवसायिकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देवून कोपरगावच्या बाजारपेठेला चालना देण्याचे काम देण्याचे आणि विद्यार्थी व तरुणांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. तसेच गोदाकाठ महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत असून या गोदाकाठ महोत्सवाची वाढलेली व्याप्ती पाहता पुढील वर्षी यापेक्षा जास्त भव्य-दिव्य नियोजन करणार असल्याचे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका  चैतालीताई काळे यांनी सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या