दुधाळ पशुधनांच्या खरेदी किमतीत दुपटीने वाढ

राज्य मंत्रिमंडळाचे अनेक महत्त्वाचे निर्णय 



लोणी : दुधाळ पशुधन वाटप योजनेच्या खरेदी किंमतीत सरकारकडून दुपट्टीने वाढ करण्यात आली असून याबाबतच्या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत आज शिक्कामोर्तब करण्यात आले. या अनुषंगाने विविध योजनांमधील प्रति दुधाळ पशुधनाच्या खरेदी किंमतीत वाढ करून गायीसाठी ४० हजारावरून ७० हजार रुपये, तर म्हशीसाठी ४० हजारावरून ८० हजार रुपये एवढी खरेदी किंमत निश्चित करण्यात आली असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. 
राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना  राबविण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे संपूर्ण राज्यभरात यांची अंमलबजावणी होऊन निश्चितच लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल. शेतकऱ्यांना,  दुध उत्पादकांना, सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना व्यवसायाची संधी उपलब्ध होऊन राज्यात दूध उत्पादनास चालना मिळेल. अशाप्रकारे नवीन वर्षात शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा देण्याचे काम केले आहे, तसेच यापुढेही राज्यसरकार शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला.
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळाले आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली. त्यानुसार 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे आता महाराष्ट्राचे राज्यगीत असेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून २०२३ या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. अमृत महोत्सवी वर्षानिम्मित प्रत्येक राज्याला एक गीत असावे असे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड झाली होती. सांस्कृतिक विभागाच्या या निर्णयाला आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली.
तसेच राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्के पेक्षा अधिक आहेअशा सर्व गावांमध्ये १७ संवर्गातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  यामुळे आदिवासी युवक युवतींना रोजगाची संधी उपलब्ध होणार आहे.  


बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)


* खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेली शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना अभिमत विद्यापीठांकरीता लागू करणार. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

* राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर १२ नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय. त्याकरिता अटींचीं पूर्तता करणे आवश्यक. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

* महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या ५० व्या बैठकीतील शिफारस क्र. ३४ नुसार अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यास मान्यता. आदिवासी युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. (सामान्य प्रशासन विभाग)
सन २०२२ च्या तेंदू हंगामापासून पुढे तेंदूपाने संकलनाव्दारे जमा होणाऱ्या संपूर्ण स्वामित्व शुल्काची रक्कम कोणत्याही प्रकारची वजाती न करता संबंधित तेंदू पाने संकलन करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहनात्मक मजुरी म्हणून देणार. (वन विभाग )

* महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणुक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, २०१२ या विधेयक मसुदा सादर करण्यास मान्यता. परवानग्या सुलभ आणि अधिक वेगवान होणार. यंत्रणेची जबाबदारी निश्चित होणार. (उद्योग विभाग )

* भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टी.सी.एस. आयओएन व आय.बी.पी.एस. या कंपन्यांकडून घेताना उमेदवारांकडून आकारण्यात येणारे परीक्षा शुल्क निश्चित. (सामान्य प्रशासन विभाग)

फलटण-पंढरपूर या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाचा आर्थिक सहभाग देण्यास मान्यता. परिसरातील रेल्वे जाळे सक्षम होणार. (गृह विभाग)

* महिला व बाल विकास विभागाच्या बालसंगोपन योजनेंतर्गत परिपोषण अनुदानात १हजार २२५ वरुन २५०० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय. (महिला व बाल विकास विभाग)

* पुणे जिल्ह्यातील निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पास ३९७६ कोटी ८३ लाख रुपयांच्या तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अवर्षण प्रवण भागात १० हजार ९७० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. (जलसंपदा विभाग)

* पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता. यामुळे पुणे जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागातील ६३ गावात २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार. (जलसंपदा विभाग)
नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रातील जमिनीच्या वापर प्रयोजनाविषयी निर्णय. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्था देखील येणार. ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व १ लाख रोजगाराची निर्मिती. (नगरविकास विभाग)

* ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. सदर योजना केवळ जिल्हास्तरावरुन अथवा राज्यस्तरावरुन न राबविता सामाजिक न्याय विभागाच्या "अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती सुधारणा योजना पूर्वीची दलित वस्ती सुधार योजना" व "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना या योजनांप्रमाणे राज्यस्तर व जिल्हास्तर अशा दोन्ही स्तरांवर राबविण्यात येणार. (आदिवासी विकास विभाग)

* महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय. अग्निसुरक्षा विषयक तरतुदींच्या अनुषंगाने सुधारणा. शैक्षणिक इमारतींची उंची ३० मीटर वरुन ४५ मीटर करणे, फायर ऑडिटर/ सल्लागार नेमणूकीची तरतूद. (नगर विकास विभाग)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या