राज्यात तीस हजार शिक्षक भरती

मुख्यमंत्र्यांची घोषणा



सिंधुदुर्ग : राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे. त्याशिवाय जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

ते शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला एकनाथ शिंदे यांनी आज उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाला दिलासा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, त्याचे समाधान वाटते. शिक्षकांनी शिक्षण देण्याचे उदात्त कार्य मोकळेपणाने करावे. शासन त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकणार नाही. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने राज्यातील मुला-मुलींना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. राज्यात शिक्षकांची 30 हजार पदे शासन भरत असून लवकरच पदभरती केली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनात सांगितलं.

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन सकारात्मक असून जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील शिक्षण विभाग काम करत आहे. हा प्रश्न टप्पाटप्प्याने सोडवता येईल का याचा देखील विचार सुरू असून त्यासाठी लागणारा वेळ शिक्षकांनी शासनाला द्यावा अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि समिती या दोन शिक्षक संघटनांचं अधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे सुरू आहे. 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान हे अधिवेशन चालणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या