शिवजयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सव


मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे १८ ते २० फेब्रुवारी या दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीमंत छत्रपती उदयन राजे भोसले, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांसह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे.  
     यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे.      
    या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील  असे नियोजन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे. किल्ले शिवनेरीवरती जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 ‘शिवकालीन गाव’  हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. 
      तीन दिवस  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.दि.१८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं.६:३० वा. हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३ उदघाटन होणार असून सायं. ७ ते रात्री १० वा. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांचा 'मराठी बाणा' कार्यक्रम होणार आहे. दि.१९ फेब्रुवारी रोजी स.९ ते ११ वा.किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा होणार असून  दु.३ ते ५ वा. शिववंदना होईल. सायं. ६:१५ ते ७ वा. महा शिवआरती कार्यक्रम होणार आहे सायं. ७ ते रात्री १० वा. जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम होईल.दि.२० फेब्रुवारी २०२३ रोजी सायं.७ ते रात्री १० वा. जाणता राजा कार्यक्रम होईल तीनही दिवशी विविध बचतगटांची उत्पादने व खाद्यपदार्थांच्या ३०० स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत.
      
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९३ वी जयंती साजरी होत आहे. त्याचबरोबर यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचली आहे. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटन प्रेमींचे मुख्य आकर्षण आहे. यात शिवनेरी, रायगड व सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे  पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा  यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या