ग्रामस्थ करतात अध्यापनाचे कार्य :पद्मश्री डॉ.पोपटराव पवार

( पारनेर प्रतिनीधी ) : - सध्या महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा संप चालू आहे.त्यामुळे संपकाळात राज्यातील सर्व शाळा बंद मात्र,हिवरेबाजार मधील शाळा याला अपवाद ठरली आहे.फक्त हिवरेबाजार मधील शाळा सुरु आहे. संपामुळे सर्वत्र शाळा बंद असताना, विशेषत: त्यामधे प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांचाही सहभाग असून सध्याचा कालखंड हा विद्यार्थ्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा असुन,ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांनी संप पुकाराल्यामुळे शालेय विद्यार्थ्याचे खुप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आदर्शगांव समीतीचे कार्याध्यक्ष व हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री डॉ.पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरे बाजार येथील सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य,सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी,सोसायटी चेअरमन व सदस्य ,शिक्षक पालक संघाचे सदस्य व गावातील सुशिक्षित पालक तसेच कोविड काळातील फ्रंटलाईन टिम आदी संप सुरु झाल्यापासून शाळेमधे जावुन प्रत्यक्ष अध्यापनाचे काम करत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हिवरेबाजार ग्रामस्थांनी उचललेले हे पाउल कौतुकास्पद असुन,निश्चित राज्यातील सर्वांसाठी आदर्शवतच आहे.फक्त संपकाळातच नाही तर, यापूर्वी कोविड काळातसुद्धा संपूर्ण देशभर शाळा बंद असताना हिवरे बाजार मध्ये १५ जून ते १५ एप्रिल या शैक्षणिक वर्षात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करुन ऑफलाईन शाळा सुरु ठेवण्यात आली होती. त्याचाच परिणाम प्राथमिक शाळेतील २४ विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत व यशवंत माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १४ विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.हिवरेबाजारच्या या उपक्रमाचे संपूर्ण राज्यामधुन कौतुक होताना दिसत आहेत. ग्रामीण भागात शाळेतील सर्व विद्यार्थी हे शेतकरी, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात त्यांना इतर कुठलेही खाजगी क्लासेस वगैरे व इतर सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य हे शिक्षकांवर आणि शाळेवरच अवलंबून असते.शिक्षणामुळे अनेक पिढ्या सुधारत असतात. तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यामधे सर्वत्र शाळा बंद असताना, हिवरेबाजारमधे मात्र ग्रामस्थांनी प्राथमिक शाळा सकाळी ७.३० ते ११ व माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते १२ या वेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या संपात जे शासकीय कर्मचारी सहभागी आहेत त्यांच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशीही मागणीसुध्दा ग्रामस्थांनी केली.हिवरेबाजारमधे सध्या ग्रामस्थ विद्यार्थ्यांचे शिक्षक बनले आहेत. एवढेच काय तर,ग्रामस्थांसह आदर्शगांव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डाॅ.पोपटराव पवार हेसुध्दा सध्या हिवरेबाजार मधील शाळेमधे विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या