धावत्या रेल्वेत पोलिसाचा सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार

 

पोलिसासह ४ जणांचा जागीच मृत्य
जयपुर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये थरार...

 




मुंबई: जयपूर-मुंबई एक्स्प्रेस पालघर स्थानकाजवळून जात असताना एका पोलिसाने सहकाऱ्यासह प्रवाशांवर गोळीबार गोळीबार केला. चालत्या ट्रेनमध्ये झालेल्या या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे कळते. त्यामुळे हे प्रकरण नेमके काय आहे, पोलिसाने गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 


पहाटे ५.२३ च्या सुमारास बी ५ कोचमध्ये ही घटना घडली. कॉन्स्टेबलने सुरुवातीला प्रवाशांना बंदुकीच्या धाकावर धरले. त्यानंतर आपल्या सहकाऱ्याला गोळ्या घातल्या. एएसआय टिका राम आणि तीन प्रवाशांचा गोळ्या लागल्याने मृत्यू झाला. आपत्कालीन साखळी ओढून कॉन्स्टेबल चेतन कुमार दहिसरजवळ खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. भाईंदरच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्याला शस्त्रासह अटक केली. गोळीबाराचा पुढील तपास सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


   ही एक्सप्रेस ट्रेन मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. याठिकाणी या मृतदेहांचे शवविच्छेदन आणि पुढील सोपस्कार पार पडतील. मात्र, हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. 

  जयपूर-मुंबई एक्स्प्रेस काहीवेळापूर्वीच मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि इतर यंत्रणांना तातडीने एक्स्प्रेस ट्रेनचा ताबा घेतला आहे. पोलिसांकडून सध्या पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. चोरीच्या प्रयत्नातून ही घटना घडली, असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

  जयपूर रेल्वे स्टेशनवरून रविवारी दुपारी दोन वाजता सुटलेली जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस आज पहाटे ६:५५ वाजता मुंबई सेंट्रल स्टेशनवर पोहोचणार होती. ट्रेनला जयपूर आणि मुंबई दरम्यानचे ११६० किमी अंतर कापण्यासाठी १६ तास ५५ मिनिटांचा कालावधी लागतो. ही एक सुपरफास्ट ट्रेन आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या