MAHARASHTRA POLITICS: आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार...

 


  • 14 नव्या मंत्र्यांचा समावेश
  • शिवसेना, भाजपच्या प्रत्येकी चार मंत्र्यांना मिळणार डिच्चू



मुंबई : सरकारचा पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन होणार असल्याने या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले नाव असेल का, याची उत्सुकता शिवसेना भाजप नेत्यांमध्ये आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता पालकमंत्रीपदाची माळ गळ्यात पडते की नाही, याची वाट ते बघत आहेत. या मंत्रिमंडळात १४ मंत्र्याचा समावेश होणार असल्याचे समजते. सध्याच्या सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने शिवसेना आणि भाजपमधील काही आमदारांना मंत्रिमंडळातून डिच्चू मिळणार आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील चार ते पाच आमदारांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती आहे. यात मराठवाड्यातील मंत्र्यांच्या कामावर केंद्रातील नेते नाराज आहेत. या नेत्यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारातून वगळण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या समोरील पेच वाढला आहे. कदाचित या पेचामुळे महाराष्ट्रातील मंत्रिमंडळचा विस्तार रखडला असेल. त्यातच एकनाथ शिंदेंबरोबर आलेल्या ४० आमदारांमध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच चालू आहे. त्यातील काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर दबाव वाढलेला आहे.

राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सामील होण्यापूर्वी शिंदेंच्या आमदारांना १२ ते १३ मंत्रिपद आणि महामंडळ भेटण्याची शक्यता होती. मात्र, ही शक्यता देखील आत्ता धूसर झालेली आहे, हे आमदारांना कळून चुकले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या गटात मोठया प्रमाणात नाराजी दिसत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटून गेला आहे. मात्र त्यांना देखील अजून खाती देण्यात आलेली नाहीत. आता आपल्या पक्षातील आमदारांची समजूत काढण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यशस्वी होतात का? हे या आठवड्यात महाराष्ट्रातील जनतेला समजेल.

मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. अजित पवारांबरोबर आठ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, अजून खातेवाटप होऊ शकले नाही. दुसरीकडे शिवसेनेच्या विद्यमान चार मंत्र्यांना डच्चू मिळाल्यास शिंदे गटात त्याचे काय पडसाद उमटणार आणि एकनाथ शिंदे पुढे काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

______


बिनखात्याचे मंत्री..!

  शपथ घेतल्यानंतर २४ तासात खातेवाटप करण्याची परंपरा आहे. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे टोलेजंग मंत्री आठ दिवस खाते वाटपशिवाय बसले आहेत. यावरुन विरोधक त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून हिणवत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या