चालकाचा ताबा सुटला, बस रस्त्याच्या कडेला उलटली, दोन जागीच...

 






जळगाव :


 तालुक्यात खासगी बसला भीषण अपघात झाला असून दुभाजकाला धडकून बस उलटली आहे. यात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी जखमी झाल्याचे समजते आहे. तर जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

नाशिक जिल्ह्यासह (Nashik) विभागात सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत असून विभागासाठी चिंताजनक बाब असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीच मागील काही महिन्यातील आकडेवारी बघता रोज होणाऱ्या अपघातांमध्ये नाशिक(Nashik accident) जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर विभागाच्या इतरही जिल्ह्यात वारंवार अपघात होत आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात पिंपळ कोठा गावाजवळ मुंबई-नागपूर (Mumbai Nagpur Highway) महामार्गावर तासाभरापूर्वी एक खासगी बस दुभाजकावर आदळून उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार प्रवासी गंभीर जखमी झाले होते, यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान जळगाव (Jalgaon Rain) जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरूच असून यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत, त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यात दुचाकी अपघात अधिक होत आहेत. दरम्यान आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ बसला अपघात झाला. हा मुबंई नागपूरमार्ग असून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. आज सकाळी या मार्गावरून बस जात असताना चालकाला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असल्याचं सांगितल जात आहे. यावेळी बस दुभाजकावर आदळून थेट पुलावरून खाली कोसळली. यात चार प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य काही प्रवाशी किरकोळ जखमी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या