गोळीबारात जखमी झालेल्या भाजप माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू...

 



 कार्यालयात घुसून 5 जणांचा अंदाधुंद गोळीबार, राजकीय क्षेत्रात खळबळ


 भाजपाचे माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावर चाळीसगाव येथील कार्यालयात घुसून पाच जणांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात ते गंभीर झाले होते. नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 


जळगावच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवक बाळु मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. याच अवस्थेत माजी नगरसेवक मोरेंना नाशिक येथील अशोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात हा गोळीबार करण्यात आला होता माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना पाच अज्ञात तरुणांनी चेहरा मास्क लाऊन त्यांच्यावर गोळीबार केला होता, या संपूर्ण प्रकाराचे दृश्य CCTV कॅमेरात कैद झाले आहे.


या प्रकरणी चाळीसगाव भागात सध्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान, पोलीस आरोपींचा शोध घेत असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. महेश गायकवाड, अभिषेक घोसाळकर, बाळू मोरे यासारख्या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे, तसेच पोलिंसावर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल उपस्थित करत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

_____



जनतेच्या मनातील दहशत कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न


चाळीसगाव येथे माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर तसेच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर पोलिस आता चांगलेच अॅक्शन मोड वर आल्याचं पाहायला मिळत असून गावातील काही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सह तडीपार असताना शहरात फिरून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी गाव भर फिरवत त्यांच्याबाबत जनतेच्या मनातील दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबत ज्या ठिकाणी अवैधरित्या सट्टा, जुगार, मटका, आणि अवैध दारू विक्री केली जात असलेली अतिक्रमण ठिकाणे देखील चाळीसगाव नगरपालिकेच्या वतीने जेसीबीने उद्भस्त करण्यात येत असल्याने गुन्हेगाराच्या मनात भीती निर्माण करण्याचा तर सर्व सामान्य जनतेला भय मुक्त करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असल्याने पोलिसांचे कौतुक होताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या