झरेकाठी | प्रतिनिधी (सोमनाथ डोळे)
संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी (अजमपूर) परिसरात बिबट्याचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून काल दुपारी तब्बल सात बोकडांना ठार तर तीन बोकडांना गंभीर जखमी केल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील गरिब शेतकरी भागवत भिमाजी लावरे यांनी घराशेजारी केलेल्या शेळीपालन गोठ्यात दुपारी सुमारे तीनच्या सुमारास बिबट्याने जाळी फाडून प्रवेश केला. त्या वेळी गोठ्यात ९ ते १० बकरे बांधलेले होते. दुपारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत बिबट्याने सात बोकडांना ठार केले तर तीन बोकड जीवघेण्या अवस्थेत जखमी झाले आहेत. गोठ्यातील भीषण दृश्य पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा भाजप सचिव भारत पाटील गीते , प्राध्यापकगीते.यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली तसेच वन विभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना मदतीसाठी तत्काळ पाचारण केले. अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी पंचनामा करून जखमी बोकडांवर उपचार सुरू केले असले तरी त्यांचा जीव वाचेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे.
या मोठ्या नुकसानीमुळे लावरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पत्नी व मुलांचे हंबरडे ऐकून माहोल हदय पिळवटून टाकणारा होता. संबंधित ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने महिला वर्गाने शेतात जाणे बंद केले आहे. कांदा काढणी व कापूस गोळा करण्याच्या कामांवर देखील परिणाम झाला आहे.
बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा — ग्रामस्थांचा इशारा
ग्रामस्थांचा संयम सुटत चालला असून वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पंचायत प्रतिनिधी व ग्रामस्थांनी दिला आहे.
या मागणीला सरपंच सौ. संगीता गीते, प्राध्यापक कान्हू गीते., भारत गीते, उपसरपंच बाजीराव गीते, भाऊसाहेब मुंढे, शिवाजीराव बोंद्रे, रमेशराव कदम, सुभाषराव मुंढे, नवनाथ दातीर, संतोष गीते, प्रभाकर दातीर, संपतराव कदम, सिताराम दातीर, दौलत दातीर, भाऊसाहेब लावरी, रामदास दातीर, भास्कर गीते, अशोक गीते, संजय बिडवे, लक्ष्मण गीते, बाळू गीते, भाऊसाहेब सांगळे नंदू इले, बाळू दराडी, सुरेश दातीर, रावसाहेब कदम, भिमराज गीते, गणपत गीते, रमेश गीते आदी ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे समर्थन दिले आहे.
शेतीपंपासाठी दिवसाची वीज पुरवठ्याची मागणी
गहू-मका पेरणीची हंगाम सुरू आहे. रात्रीच्या वेळी बिबट्याची दहशत आणि प्रचंड थंडीमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे किमान पाच तास तरी दिवसा शेतीपंपांना वीज पुरवठा करावा, अशी मागणी भारत पाटील गीते यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
सध्या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून शासन व वन विभागाने यापुढील अनर्थ टाळण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.
0 टिप्पण्या