दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पोर्णिमेनिमित्त 1100 वटवृक्षांचे रोपन गावागावात होणार वटवृक्षांचे रोपन




संगमनेर ( प्रतिनिधी ) -  थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हरितसृष्टीसह पर्यावरण संवर्धनाचा मुलमंत्र देणाऱ्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी तालुक्यातील प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर 1100 वटवृक्षांचे रोपन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पप्रमुख सौ.दुर्गाताई तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

यावेळी माहिती देताना सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे अभियान मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, दंडकारण्य अभियानाचे मुख्यप्रवर्तक मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ झाले आहे. वृक्षसंस्कृती जोपासणाऱ्या या चळवळीने देशपातळीवर मोठा लौकिक निर्माण केला आहे. प्रत्येक नागरिकांच्या सहभागामुळे या चळवळीला यश आले आहे. यामुळे वृक्षतोड टळली असून उजाड बोडखी डोंगरे झाडांनी हिरवीगार दिसू लागली आहे.
भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचा असणारा वटपोर्णिमा हा महिलांचा सण आहे. वडाचे झाड अत्यंत औषधी व आरोग्यासाठी फलदायी आहे. आयुर्वेदामध्येही वटवृक्ष,रुई,उंबर,पिंपळ या झाडांना देव वृक्ष म्हणून संबोधले आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ही वृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सीजन निर्माण करतात. हिरवीगार सावली, परिसराचे वैभव, आयुर्वेद, पूजापाठ व सजीवांसाठी शुद्ध ऑक्सीजन मिळणार आहे. वटवृक्षाची सावली व थंडावा पशुपक्षांनाही आकर्षित करतो म्हणून असा हा वटवृक्ष प्रत्येक गावात व वाडीवस्तीवर असावा यासाठी दंडकारण्य अभियान समितीच्या वतीने प्रत्येक गावात व वाडीवस्तीसाठी किमान पाच असे तालुक्यात एकूण 1100 वटवृक्षाचे रोपे देण्यात येणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला भगिनीच्या हस्ते या झाडाचे रोपन करुन त्याचे  पूजन व संगोपणाची जबाबदारी स्थानिक नागरिकावर देण्यात येणार आहे असेही त्या म्हणाल्या.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या, की पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याने ग्लोबल वॉर्मिगची समस्या उभी राहून उन्हाळ्यात लहान, मोठ्या सजिवांना जगणे असहाय्य झाले आहे. म्हणून प्रत्येक महिलेने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे. घराच्या भोवती परसबाग लावून फळझाडे, फूलझाडे वाढवावी. पुढील पिढीला झाडाच्याच सावलीत खेळण्याचा आनंद मिळावा त्यांना निरोगी जीवन लाभावे म्हणून दंडकारण्य अभियानात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
महिला वर्गातून या अभिनव उपक्रमाचे मोठे स्वागत करण्यात आले असून संगमनेर तालुक्याचा हा उपक्रम संपूर्ण राज्याला मार्गदर्शक ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या