अहिल्यानगर : लोकशाहीच्या सर्वात महत्त्वाच्या प्रक्रियेला बळकटी देणाऱ्या निवडणूक यंत्रणेतील डेटा एन्ट्री ऑपरेटर आज स्वतःच्या आर्थिक अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. गेली ८ ते १० वर्षे तहसील कार्यालयांच्या निवडणूक शाखेत कार्यरत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील डेटा एन्ट्री ऑपरेटरांनी वाढीव मानधनासाठी जिल्हा निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विशाल सदनापुरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, विशेष संक्षिप्त पुनरीक्षण, निवडणूक कार्यक्रमांचे व्यवस्थापन आणि विविध तातडीच्या कामांचा मोठा भार सांभाळणाऱ्या १९ हजार रुपये मानधन मिळत आहे. मात्र पीएफ व इतर कपातीनंतर मिळणारी रक्कम मोठ्या प्रमाणात घटल्याने वाढती महागाई, शिक्षण व आरोग्य खर्च भागवणे कठीण झाल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
ऑपरेटरांनी धाराशिव जिल्ह्याचा दाखला देत तेथील निवडणूक डेटा एन्ट्री ऑपरेटरांना एकूण ३२ हजार ५२५ रुपये मानधन मंजूर असून कपातीनंतर त्यांच्या हातात २० हजार ३८२ रुपये मिळत असल्याचे सांगितले आहे. तसेच कृषी विभागाच्या पीएम किसान योजनेतील संगणक चालकांना प्रतिमहिना २७ हजार ९०० रुपये मानधन दिले जात असल्याकडेही लक्ष वेधले आहे.
कामाचे स्वरूप व जबाबदारी समान असताना मानधनात मोठी तफावत असल्याने धाराशिव जिल्हा किंवा पीएम किसान योजनेच्या धर्तीवर वाढीव मानधन मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेदनावर जिल्ह्यातील सर्व निवडणूक डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या सह्या आहेत.

0 टिप्पण्या